Women and Child Development Department : राज्यातील महिला व बाल विकास विभागाने तब्बल 23 वर्षांनंतर मोठा निर्णय घेतला आहे. विभागाच्या कामकाजाला गती देण्यासाठी नवीन पदांना मंजुरी देण्यात आली असून यामुळे प्रशासन अधिक मजबूत होणार आहे. याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

शासनाच्या निर्णयानुसार विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. काही पदे कमी करून त्याऐवजी 165 नवीन पदांची भर घालण्यात आली आहे. यामुळे आता एकूण 8 हजार 669 नियमित पदांना मंजुरी मिळाली आहे. ही पदे लवकरच भरली जाणार असून त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. याशिवाय विभागाच्या विविध कामांसाठी 2 हजार 843 पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यालाही मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मोठी संख्या कार्यरत आहे. राज्यात एकूण 1 लाख 10 हजार 664 अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याअंतर्गत 2 लाख 21 हजार 328 मानधनाधारित पदे मंजूर आहेत. या कर्मचाऱ्यांचे मानधन केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुक्रमे 60 आणि 40 टक्के प्रमाणात दिले जाते.
निधी वितरणासाठी आता ‘SNA SPARSH’ ही डिजिटल प्रणाली वापरण्यात येत आहे. या प्रणालीमुळे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक बनते. यामुळे कामकाजात वेग आणि अचूकता येणार आहे.
या निर्णयामुळे महिला आणि बालकल्याणाशी संबंधित योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. दीर्घ काळानंतर घेतलेल्या या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी मदत होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.







