चाकण : चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरून वातावरण चांगलेच तापले आहे. खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून २० लघुउद्योगांनी कंपन्या बंद करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज चाकण एमआयडीसीचा दौरा करून उद्योजकांशी चर्चा केली.

यावेळी चाकण एमआयडीसीतील विविध प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्णय घेण्यात आले. येत्या ३१ ऑगस्टपर्यंत परिसरातील सर्व खड्डे बुजवण्यात येतील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

वाहतूक कोंडीवर शॉर्ट, मिड आणि लॉंग टर्म उपाययोजना
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चाकणमधील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

तातडीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून आरएमसीसारख्या साहित्याचा वापर करून खड्डे बुजवण्यात येणार आहेत. मंजूर रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा इशाराही सामंत यांनी दिला.
अनधिकृत पार्किंगवर कारवाई
चाकण एमआयडीसीतील अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यांची रुंदी तीन मीटरने वाढवण्याचे नियोजन असून, आवश्यक ठिकाणी सबस्टेशनची संख्याही वाढवण्यात येणार आहे.
दरम्यान, ५९ कोटी रुपयांचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून, त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी खड्डे बुजवण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच ट्रक टर्मिनल उभारण्यात आले असून, एमआयडीसीकडून रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
घनकचरा आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्नही सोडवणार
चाकण एमआयडीसीतील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्नही मार्गी लावण्यात येणार आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत असून, पीएमआरडीएकडून याबाबत निविदा काढण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील स्वतः चाकणमध्ये येऊन या विषयावर बैठक घेतील, अशी माहिती सामंत यांनी दिली.
दर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
चाकण एमआयडीसीतील प्रश्नांचा सातत्याने आढावा घेण्यासाठी दर शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकांमध्ये उद्योजकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तत्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
आजपासून पुढील दहा महिन्यांत उद्योजकांच्या अपेक्षेतील सर्व कामे पूर्ण करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. तसेच आपण स्वतः दर दोन महिन्यांनी बैठक घेऊन कामांचा आढावा घेणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.






