पुणे : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त आणि आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा कठोर भूमिका मांडली आहे. राज्यभर अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर एफडीएकडून कारवाई सुरू असताना, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला.

राज्यभर सुरू असलेल्या कारवाईदरम्यान कोणी लाच देण्याचा प्रयत्न केला आहे का, असा प्रश्न मुंढे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “मला वाटत नाही की कोणी माझ्याशी पंगा घेण्याची हिंमत करेल. जर कोणी असा विचारही करत असेल, तर त्यांनी १०० वेळा विचार केला पाहिजे,” असे स्पष्ट केले.

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मुंढे यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत असून, त्यांच्या कारवाईला मोठा जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र आहे.

“मी काही असाधारण काम करत नाही”
आपल्याला अनेक लोक प्रेरणास्थान मानतात, याबाबत विचारले असता तुकाराम मुंढे यांनी या कौतुकाचे श्रेय न घेता आपली भूमिका स्पष्ट केली. “मी कोणतेही असाधारण काम केलेले नाही. मी काही खूप मोठे किंवा वेगळे करतोय असे मला वाटत नाही. मी फक्त माझ्या पदाला आणि भूमिकेला साजेसे काम करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे त्यांनी सांगितले.
समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, तर एक चांगला आणि सक्षम समाज निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
राजकारणात जाणार का?
तुकाराम मुंढे यांच्या राजकारणातील संभाव्य प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले. आपल्या स्पष्टवक्त्या आणि प्रामाणिक स्वभावामुळे राजकारण आपल्यासाठी योग्य ठरेल असे वाटत नसल्याचे त्यांनी संकेत दिले.
“माझ्यासारखा अत्यंत स्पष्टवक्ता आणि प्रामाणिक माणूस राजकारणात स्वीकारला जाईल, असे मला अजिबात वाटत नाही,” असे मुंढे म्हणाले.
दरम्यान, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुंढे यांनी भ्रष्टाचार आणि लाचखोरीबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे अन्न व्यवसाय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.







