सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटच्या ग्रामीण भागात शेतीसाठी होणाऱ्या वीज कपातीमुळे शेतकरी संतापले असून आता त्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. वीज पुरवठ्याचा बोजवारा उडाल्यामुळे हवालदिल झालेल्या आळगे गावातील शेतकऱ्यांनी थेट कर्नाटक राज्यात सामील होण्याची मागणी करून प्रशासनाला धक्का दिला आहे.

भीमा नदीच्या काठावर आमची जमीन असूनही आम्हाला सिंचनासाठी दिवसाला केवळ 2 तास वीज मिळते. या तुटपुंज्या वीज पुरवठ्यामुळे हाता-तोंडाशी आलेली पिके जळून खाक होत आहेत, तर जनावरांच्या चाऱ्याचा आणि दुग्धव्यवसायाचा प्रश्न हाताबाहेर गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यांची जगण्याची धडपड सुरू आहे. याप्रकरणी स्थानिक शेतकऱ्यांच्या ‘मूलभूत हक्क संघर्ष समिती’ने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन सादर केले आहे.

शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर एक संतापजनक वास्तव मांडले आहे. नदीच्या दुसऱ्या तीरावर असलेल्या कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांना दररोज 8 तास वीज पुरवली जाते. एकाच नदीकाठी राहून आमच्यावर असा अन्याय का? असा सवाल करत शेतकऱ्यांनी विचारला आहे. जर आम्हाला आमच्या शेतीला वाचवण्यासाठी पुरेसा वीजपुरवठा देणे शक्य नसेल, तर आम्हाला कर्नाटक राज्यामध्ये विलीन होण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








