सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका पोलिसांना तब्बल १५ महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या महिला आरोपीला अखेर अटक करण्यात यश आले आहे. राणी अरुण साळवे-भिवसने (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, ती मूळची छत्रपती संभाजीनगरमधील बहुसिंगपुरा परिसरातील आहे. नृत्याचे कार्यक्रम करत सतत ठिकाण आणि मोबाईल क्रमांक बदलून ती पोलिसांना चकवा देत होती. मात्र, पोलिसांनी वेगळीच शक्कल लढवत शेतकरी आणि शेतमजुरांचा वेश धारण करून दीड दिवस पाळत ठेवली आणि अखेर तिला ताब्यात घेतले.

बार्शी तालुका पोलीस ठाण्यात मिसाळ नामक तक्रारदाराच्या बॅगेतून १२ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याप्रकरणी राणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर ती पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी सातत्याने ठिकाणे बदलत होती.

राणी विविध शहरांमध्ये नृत्याचे कार्यक्रम करत होती. कार्यक्रम संपल्यानंतर ती लगेच मोबाईल क्रमांक बदलत असे आणि दुसऱ्या ठिकाणी निघून जात असे. त्यामुळे तिचा ठावठिकाणा शोधणे पोलिसांसाठी आव्हान ठरत होते. तब्बल १५ महिने ती पोलिसांना हुलकावणी देत होती.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने राणीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. या तपासातून ती छत्रपती संभाजीनगरमधील बहुसिंगपुरा परिसरातील डोंगराळ भागात लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
डोंगराळ भाग असल्याने पोलिसांच्या वाहनांची किंवा गणवेशातील पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी थेट गणवेशात कारवाई न करण्याचा निर्णय घेतला.
पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी शेतकरी आणि शेतमजुरांचा वेश धारण केला. मळके कपडे परिधान करून तसेच शेतीची अवजारे सोबत घेऊन पोलिस पथकातील सदस्य परिसरात वावरू लागले. सलग दीड दिवस उन्हातान्हात शेतकरी-मजुरांप्रमाणे फिरत त्यांनी राणीच्या हालचालींवर लक्ष ठेवले.
पोलिसांबाबत कोणताही संशय निर्माण होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली. योग्य संधी मिळताच शेतकरी वेशातील पोलिसांनी अचानक कारवाई करत राणीला ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे गुन्हा केल्यानंतर वेषांतर करून, मोबाईल क्रमांक बदलून किंवा ठिकाणे बदलून कितीही काळ पोलिसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका होत नाही, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. बार्शी पोलिसांच्या या अनोख्या कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे.







