सातारा: साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या वसतिगृहात 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. सातारा शहर पोलिसांनी वसतिगृहाच्या रेक्टर जयश्री जकाते यांना अटक केली आहे. याशिवाय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे आणि हॉस्टेल समितीतील अन्य सदस्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत विद्यार्थिनी सृष्टी भानुदास बिरामणे हिने वसतिगृहातील काही सुविधांबाबत आक्षेप घेतला होता. विशेषतः शौचालयाच्या समस्येबाबत तिने आवाज उठवला आणि त्यासंदर्भात व्हिडिओ तयार केल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यानंतर तिला मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

2 सप्टेंबर रोजी सृष्टीने वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता तिच्या हस्ताक्षरातील चार ओळींची चिठ्ठी मिळाल्याचे सांगण्यात आले. या चिठ्ठीत तिने वसतिगृहात होत असलेल्या दबावाचा उल्लेख केल्याचा दावा करण्यात आला आहे.

सृष्टीच्या वडिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. रेक्टर आणि हॉस्टेल समितीतील काही व्यक्तींनी तिच्यावर दबाव टाकला. तिच्याकडून जबरदस्तीने कबुलीचा व्हिडिओ तयार करून घेतला आणि महाविद्यालयातून हाकलून देण्याची तसेच पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकाराची माहिती असतानाही प्राचार्यांनी योग्य हस्तक्षेप केला नाही, असा आरोपही विद्यार्थिनीच्या वडिलांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, रेक्टर जयश्री जकाते यांना निलंबित करण्यात आले असून त्या पोलीस कोठडीत आहेत. प्राचार्य डॉ. साळुंखे यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. प्रकरणातील इतर संबंधितांना चौकशीसाठी पोलिसांसमोर उपस्थित राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व बाजू तपासल्या जात आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वसतिगृहाच्या इमारतीला संरक्षक जाळी बसवण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.






