सांगली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (Maharashtra Politics) पडघम वाजताच राजकीय (Sangali News) हालचालींना वेग आला आहे. अशातच सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक बन्नेनवर यांनी पत्नी आणि माजी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर यांच्यासह शनिवारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या घडामोडीमुळे जत शहरातील आगामी पालिका निवडणुकीचे राजकीय गणित पूर्णपणे बदलणार आहे.

अशोक बन्नेनवर हे जत तालुक्यातील परिचित सामाजिक कार्यकर्ते असून बहुजन समाजाचा मजबूत चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या 25 वर्षांपासून ते स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती. त्यानंतर यशवंत सेना आणि रासपच्या माध्यमातून राजकारणात काम करत 2010 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते माजी आमदार विक्रम सावंत यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते.
पत्नी शुभांगी बन्नेनवर यांनी देखील राजकारणात सक्रिय भूमिका निभावली आहे. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कारकीर्द सुरू केली आणि नंतर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. 2017 साली त्या जत शहराच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा बनल्या. त्यांच्या कार्यकाळात शहरातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात गती आली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले आणि त्यांचा स्वतःचा एक प्रभावी कार्यकर्त्यांचा गट निर्माण झाला.
आता दोघांनी भाजपात प्रवेश केल्याने जत शहरात भाजपची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. भाजपचे नेते डॉ. रवींद्र आरळी, शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, चंद्रशेखर गोब्बी, अण्णा भिसे, ज्योती घाडगे, परशुराम मोरे आणि इतर अनेक पदाधिकारी या प्रवेश सोहळ्याला उपस्थित होते.
या वेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, जत आणि परिसरातील राजकारण अनेक वर्षांपासून काही प्रस्थापित नेत्यांच्या वर्चस्वाखाली राहिले आहे. यामुळे सामान्य लोक विकासापासून दूर राहिले. मात्र 2014 नंतर राज्यात सत्ता बदलल्यानंतर हे समीकरण हळूहळू बदलत आहे. अशोक आणि शुभांगी बन्नेनवर यांच्या प्रवेशामुळे जत तालुक्यात भाजपला मोठे बळ मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
अशोक बन्नेनवर म्हणाले की, गेल्या 25 वर्षांपासून आम्ही सातत्याने लोकसेवा करत आहोत. आमच्या कुटुंबाने ग्रामपंचायतपासून नगराध्यक्षपदापर्यंत सेवा दिली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. सत्ता नसल्यास विकास होऊ शकत नाही, त्यामुळे जनतेच्या विश्वासाने पुन्हा शहराच्या विकासासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.






