तुळजापूर: माणुसकीला (Crime News) काळिमा फासणारी घटना तुळजापूर तालुक्यातील अणदूर शिवारात घडली आहे. अवघ्या १७ वर्षांच्या मुलाने किरकोळ घरगुती वादातून वडिलांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. कौटुंबिक कलहाचा शेवट इतका भयानक असू शकतो, या विचारानेच संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

महिपती अंबाजी सुरवसे (वय ४५) यांचा संसार पहिल्या पत्नीच्या निधनानंतर विस्कटला होता. त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले होती. चार वर्षांपूर्वी महिपती यांनी दुसरे लग्न केले, त्यांना एक मुलगी झाली. मात्र, सावत्र आईने ‘कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया’ करावी, असा अजब हट्ट ही दोन्ही मुले वडिलांकडे धरून होती. मालमत्तेचा वाटा कमी होईल, या भीतीतून हा हट्ट असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
शुक्रवारी रात्री महिपती हे मुलाला जेवणाचा डबा देण्यासाठी शेतात गेले होते. तिथे पुन्हा हाच जुना विषय निघाला आणि संवादाचे रूपांतर वादात झाले. रागाच्या भरात १७ वर्षीय मुलाने महिपती यांना खाली पाडून त्यांच्यावर मोठ्या दगडांनी एका मागून एक वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, महिपती यांचा जागीच मृत्यू झाला
मयत महिपती यांची आई लक्ष्मीबाई सुरवसे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मुलगा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.






