शिर्डी: महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतीच्या मोठ्या नुकसानीची दखल घेत, केंद्र सरकारकडून तातडीने भरीव मदतीची घोषणा केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांनी दिली आहे. राज्य सरकारकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच क्षणाचाही विलंब न करता केंद्र सरकार मदत जाहीर करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमित शहा (Amit Shah) हे लोणी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. तसेच डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभही झाला.

काय म्हणाले शहा? (Amit Shah)

शहा यांनी सांगितले की, 2025-26 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने 3,132 कोटी रुपयांची मदत मंजूर केली असून, त्यापैकी 1,631 कोटींचे वाटप एप्रिलमध्येच झाले आहे. महाराष्ट्रासाठी 215 कोटींचे विशेष पॅकेज देण्यात आले आहे. याशिवाय कर्जवसुलीला स्थगिती, विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये सवलती यांसारखे निर्णय घेण्यात आले आहेत.
आपल्या भाषणात शहा यांनी डॉ. विखे पाटील यांचे सहकार, ग्रामीण विकास आणि शेतकरी कल्याण क्षेत्रातील योगदान स्मरणात ठेवले. त्यांनी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करून सहकार चळवळीला गती दिली. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या वित्त राज्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील योगदानाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
यावेळी कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.







