सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या सीमेजवळ असणाऱ्या गोविंदपूर (जि. विजयपूर, कर्नाटक) येथे आज, २९ मे रोजी जमिनीच्या वादातून एका भीषण सामूहिक हत्याकांडाची घटना घडली. याच जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या रागातून आज सायंकाळी ५ च्या सुमारास हा भयानक प्रकार घडला. विरोधकांनी थेट गोळीबार करत निराळे कुटुंबावर हल्ला केला. गोळीबार करून तब्बल ६ जणांची हत्या करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मृत पावलेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील ५ लोकांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील चडचण येथील निराळे कुटुंबाने गोविंदपूर भागातील रामपुरे कुटुंबाकडून काही शेतजमीन विकत घेतली होती. हाच जमिनीचा व्यवहार रामपुरे कुटुंबातील काही लोकांना मान्य नव्हता. याच वादातून केलेल्या गोळीबारात निराळे कुटुंबातील ५ सदस्य आणि त्यांच्यासोबत असणारा मुस्लिम समाजाचा १ व्यक्ती अशा एकूण ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील तिहेरी खुनाची घटना ताजी असतानाच, आता या ६ जणांच्या हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे निराळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







