नागपूर: नागपुरातील मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये घडलेल्या रक्तरंजित घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. हॉटेलच्या सजवलेल्या खोलीत २८ वर्षीय तरुणीचा चाकूने वार करून खून करण्यात आला, तर तिच्यासोबत असलेल्या तरुणाने स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर तरुणाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मनीषनगरमधील अजित बेकरीच्या मागील बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये मंगळवारी शिवानी राजानंद गजभिये (वय २८, रा. अजनी) आणि किरण संजय आत्राम (रा. अजनी) यांनी रूम क्रमांक ३०२ घेतली होती. दोघेही भारतीय रेल्वेत कार्यरत असल्याची माहिती आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक या खोलीतून तरुणीच्या ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज हॉटेल कर्मचाऱ्यांना ऐकू आला.

आवाज ऐकताच कर्मचाऱ्यांनी तातडीने खोलीकडे धाव घेतली. दरवाजा उघडल्यानंतर शिवानी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली, तर किरणही गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शिवानीला मृत घोषित केले. तिच्या शरीरावर चाकूने अनेक वार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या घटनेतील आणखी एक बाब पोलिसांच्या तपासाचा केंद्रबिंदू ठरली आहे. ज्या खोलीत हा प्रकार घडला, ती खोली गुलाबाच्या पाकळ्या आणि फुग्यांनी सजवण्यात आली होती. शिवानीच्या गळ्यात मंगळसूत्र होते. तसेच किरणने स्वतःवर वार केल्यानंतर तिच्या भांगेत कुंकवाऐवजी रक्ताचा टिळा लावल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून वाद सुरू असल्याची चर्चा आहे. हा वाद मिटवण्यासाठी किंवा एकत्र वेळ घालवण्यासाठी दोघे हॉटेलमध्ये आले असावेत, असा प्राथमिक संशय आहे. मात्र, खोलीत वाद विकोपाला गेल्यानंतर किरणने चाकूने शिवानीवर हल्ला केल्याची शक्यता तपासली जात आहे.
हा हल्ला पूर्वनियोजित होता का, चाकू आधीच सोबत आणण्यात आला होता का आणि हॉटेलची सजावट नेमकी कोणी केली होती, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे बेलतरोडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.






