नाशिक : नाशिक मधून एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे जीव गेलेल्या व्यक्तीच्या नावावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत असून, खड्ड्यांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना सोडून मयत व्यक्तीवरच गुन्हा दाखल केल्याने नातेवाईक संतप्त झाले आहेत.

नेमकी घटना काय आहे?
महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंजाळ मळा या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे साठ वर्षीय दिनकर झिटे या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा अपघात होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मात्र, पोलिसांनी या अपघाताला स्वतः दिनकर झिटे हेच जबाबदार असल्याने त्यांच्याविरोधातच गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, ‘दिनकर झिटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, या घटनेचा तपास करत असताना प्रत्यक्ष साक्षीदार मिळाले आणि त्यांच्या सांगण्यावरून मयत दिनकर झिटे हे वेगाने दुचाकी चालवत होते. तसेच त्यांच्या दुचाकीला लाईटही नव्हता आणि हेल्मेटही घातलेले नव्हतं त्यामुळे ते स्वतःच त्यांच्या मृत्यूला करणीभूत ठरले असल्याच पोलिसांनी सांगितलं.
मात्र, मयत दिनकर झिटे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने कुटुंबीय संतप्त झाले असून पोलीस आयुक्तांना भेटून यासंदर्भात निवेदन दिले आहे. कुटुंबीयांनी निवेदनात म्हंटले आहे की, ‘या अपघातातील दोषींवर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे या रस्त्यावर दिनकर हे गाडी जोरात चालवत होते. पण आपण या रस्त्यावर गाडी जोरात चालवू शकत नाही. मात्र, पोलिसांनी तक्रारीत बेधडकपणे वेगाने चालवण्याचा उल्लेख केला असून या गोष्टी चुकीच्या असून आम्हाला हे मान्य नसल्याचं नातेवाईकांकडून निवेदनात सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, या घटनेची सध्या जोरदार चर्चा रंगली असून, या प्रकरणात काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







