पुणे: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा प्रणालीत व्यापक सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असून, देशातील परीक्षा व्यवस्थेला अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित बनवण्याची जबाबदारी या समितीकडे असेल.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशातून विद्यार्थी आणि पालकांना आश्वस्त केले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणालाही खेळू दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू असून अशा आरोपींना कायद्यापुढे उभे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणांमध्ये जलद न्याय मिळावा यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची व्यवस्था करण्यात आली असून, पेपरफुटीसारख्या गुन्ह्यांवर अधिक कठोर कारवाई करण्यासाठी नवीन कायदेशीर तरतुदींवरही सरकार काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यातील परीक्षा व्यवस्थेबाबत बोलताना पंतप्रधानांनी केवळ दोषींना शिक्षा देणे पुरेसे नसल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी संपूर्ण परीक्षा प्रणालीमध्ये मूलभूत बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याच उद्देशाने नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्स देशातील विद्यमान परीक्षा यंत्रणेचा सखोल अभ्यास करेल. सुरक्षेतील त्रुटी, तांत्रिक उणिवा आणि आवश्यक सुधारणा याबाबतचा सविस्तर अहवाल ही समिती सरकारला सादर करणार आहे.
या अहवालाच्या आधारे भविष्यातील सर्व स्पर्धा आणि प्रवेश परीक्षा अधिक पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित आणि पेपरफुटीला आळा घालणाऱ्या ‘लीक-प्रूफ’ पद्धतीने घेण्याचा सरकारचा मानस असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला न्याय देणारी आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था उभी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुधारणा टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.






