पुणे: कल्याण–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्याची गंभीर घटना घडली असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माळशेज घाटातील करणजाळे गावाजवळ अचानक रस्त्याचा मोठा भाग खचला. रस्त्याला पडलेल्या मोठ्या भेगा आणि खचलेल्या भागामुळे वाहनचालकांसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. प्राथमिक पाहणीत रस्ता सुमारे पाच ते सहा फूट खोल खचल्याचे, तसेच जवळपास १०० मीटरपर्यंत नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला केवळ हलक्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती, तर एसटी बस, ट्रक, टेम्पो आणि इतर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. मात्र, भूस्खलनाचा धोका अधिक वाढल्याने अखेर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी माळशेज घाट पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आळेफाटा–राजगुरुनगर–चाकण–तळेगाव एमआयडीसी–लोणावळा–मुंबई तसेच आळेफाटा–संगमनेर–नाशिक–कसारा–कल्याण–मुंबई हे पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत.
दरम्यान, संबंधित यंत्रणांकडून रस्त्याची पाहणी आणि दुरुस्तीच्या कामाचे नियोजन सुरू आहे. पुढील आदेशापर्यंत माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर घाट परिसरात भूस्खलनाचा धोका कायम असल्याने वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.






