State Cabinet Meeting: मुंबई: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. आचारसंहितेच्या (Code Of Conduct) चौकटीत राहून या बैठकीत चार महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.

या बैठकीत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सुधारणेनुसार नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षांना सदस्यत्व देण्यात येणार असून त्यांना मतदानाचा अधिकारही मिळणार आहे. या बदलासाठी अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे मंत्रिमंडळाने स्पष्ट केले.
तसेच धाराशिव शहरात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय प्रशासन बळकट करण्याच्या दृष्टीने ग्राम, तालुका आणि जिल्हा स्तरावरील प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी ‘जिल्हा कर्मयोगी 2.0’ आणि ‘सरपंच संवाद’ कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागात कार्यरत तसेच सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय
सामान्य प्रशासन विभाग: ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी 2.0 व सरपंच संवाद कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
ग्रामविकास व पंचायत राज विभाग: जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागातील बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार आहेत.
महसूल विभाग: धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी एक एकर जागा मंजूर करण्यात आली आहे.
नगर विकास विभाग: महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्यात येणार असून थेट जनतेतून निवडून आलेल्या अध्यक्षांना सदस्यत्व व मतदानाचा अधिकार, देण्यात येणार आहे.






