नवी दिल्ली: अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेला दिल्ली विरुद्ध गुजरात हा सामना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात थरारक सामन्यांपैकी एक ठरला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या लढतीत गुजरात टायटन्सने दिल्लीचा अवघ्या 1 धावेने पराभव केला. विजयासाठी शेवटच्या 2 चेंडूत 2 धावांची गरज असताना, मैदानात सेट झालेला डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. पाचव्या चेंडूवर सिंगल घेण्याची संधी असतानाही मिलरने धाव घेण्यास नकार दिला. त्याला स्वतःवर आत्मविश्वास होता की तो शेवटच्या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारून सामना जिंकेल. मात्र, प्रसिद्ध कृष्णाने टाकलेला शेवटचा चेंडू मिलरला चकवून गेला आणि दिल्लीने हातात आलेली मॅच गमावली.
आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे संघ हरला, या विचाराने मिलर मैदानातच सुन्न होऊन बसला. त्याला अश्रू अनावर झाले आणि तो रडू लागला. हे पाहून अक्षर पटेलने क्षणाचाही विलंब न लावता मिलरकडे धाव घेतली. अक्षरने त्याला आधार दिला, मिठी मारली आणि सांत्वन केले. पराभवाच्या दुःखात असलेल्या खेळाडूला अशा प्रकारे सावरणं, ही ‘खिलाडूवृत्ती’ क्रिकेट चाहत्यांच्या काळजाला स्पर्श करून गेली.
केएल राहुलने 52 चेंडूत 92 धावांची वादळी खेळी केली. मधल्या षटकांमध्ये राशीद खानने घेतलेल्या 3 विकेट्स दिल्लीला सर्वात महाग पडल्या. सामना संपल्यावर अक्षर पटेल म्हणाला, “आम्ही आणखी हुशारीने खेळायला हवे होते. केएल राहुलने अप्रतिम खेळ केला, पण मोक्याच्या वेळी विकेट्स पडल्याने गणित बिघडले.”







