मुंबई : महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आता मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे. राज्य सरकारने मोटार वाहन नियमांमध्ये बदल करून व्यावसायिक प्रवासी वाहनांच्या चालकांसाठी मराठी भाषा येणे आवश्यक केले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.

नव्या नियमांनुसार मराठी बोलता किंवा समजता येत नसल्याचे आढळल्यास संबंधित चालकाच्या परवान्यावर कारवाई होऊ शकते. आज या निर्णयाबाबत अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध होण्याची शक्यता असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत करण्यात आलेल्या सुधारणा असलेले Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2026 आजपासून लागू करण्यात येणार आहेत.

या नियमाचा उद्देश चालक आणि प्रवाशांमध्ये सहज संवाद व्हावा, हा असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे. विशेषतः रिक्षा, टॅक्सी तसेच ॲपच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या कॅब चालकांसाठी ही अट लागू करण्यात आली आहे. चालकाकडे आवश्यक मराठीचे व्यवहारिक ज्ञान नसल्यास संबंधित प्राधिकरणाला त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार असेल.

नियमांनुसार सुरुवातीला चालकाला आपली पात्रता पूर्ण करण्यासाठी संधी दिली जाणार आहे. त्यानंतरही मराठीचे आवश्यक ज्ञान प्राप्त झाले नाही किंवा नियमांचे सातत्याने उल्लंघन केले, तर ड्रायव्हिंग लायसन्सवरील संबंधित अधिकृतता कमाल 3 महिन्यांपर्यंत निलंबित केली जाऊ शकते. त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास ही अधिकृतता कायमची रद्द करण्याची तरतूद आहे.
नव्या सुधारणांचा परिणाम केवळ चालकांवरच होणार नाही. काही प्रकारच्या परमिटधारकांसाठीही व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे. तसेच ॲप-आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या मोटार कॅबच्या परमिटच्या नूतनीकरणासाठीही ही अट लागू राहणार आहे.
प्रताप सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात व्यावसायिक वाहतूक सेवा देणाऱ्यांना मराठीचे ज्ञान असणे याबाबत आधीपासून नियमांमध्ये तरतूद होती. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे नियम अधिक स्पष्ट करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, या निर्णयाला ‘महाराष्ट्र मोटार वाहन कायदा 2026’ असे म्हणणे अचूक नसून, हे बदल ‘Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2026’ अंतर्गत करण्यात आले आहेत. या सुधारणांमुळे प्रवासी वाहतूक क्षेत्रात मराठी भाषेच्या व्यवहारिक ज्ञानाची अट अधिक स्पष्ट झाली आहे.







