पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला, तरी काही विशिष्ट भागांमध्ये अजूनही पावसाच्या सरी सुरूच आहेत. हवामान विभागाने आज (7 ऑगस्ट) पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत आज ऊन-पाऊस असणार आहे. तर काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान राहील, तर काही भागांत विजांसह हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, मध्य भारतात पावसाचा जोर कायम राहणार असून, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुरुवारी (6 ऑगस्ट) सकाळी संपलेल्या 24 तासांत राज्यातील विविध भागांत हवामानात मोठे बदल पाहायला मिळाले. त्यानुसार दावडी येथे सर्वाधिक 130 मिमी पावसाची नोंद झाली.चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 34.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
महाबळेश्वर येथे नीचांकी 18 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सध्या पंजाबच्या फिरोजपूरपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर प्रदेश आणि बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात चक्रीवादळासारखी वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान बदलांमुळेच काही भागांत पावसाचा जोर वाढला असून, बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि विजांचा कडकडाट होत आहे
नागरिकांनी आणि विशेषतः घाटमाथ्यावरून प्रवास करणाऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







