छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Shocking News) सिल्लोड तालुक्यातील घाट नांद्रे येथे घडलेली एक धक्कादायक घटना घडली आहे, पुन्हा (Chhatrapati Sambhajinagar) एकदा बेकायदेशीर गर्भपात आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय गोळ्या घेतल्याने महिलेला (Sillod News) जीव गमवावा लागला आहे. आयशा समीर मुल्ला (वय 28) या महिलेचा गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन केल्यानंतर तब्बल 13 दिवस मृत्यूशी झुंज देत उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, आयशा यांनी 10 फेब्रुवारीच्या सुमारास गर्भपातासाठी औषधांचे सेवन केले. काही तासांतच त्यांना तीव्र पोटदुखी आणि मोठ्या प्रमाणावर अतिरक्तस्राव सुरू झाला. सुरुवातीला हा त्रास सामान्य असल्याचे समजून दुर्लक्ष करण्यात आले, मात्र रक्तस्राव थांबत नसल्याने त्यांना सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सुमारे 10 दिवस उपचार झाले, पण प्रकृती अधिकच खालावत गेल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र 13 दिवसांच्या संघर्षानंतर त्यांचा मृत्यू झाला.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, गर्भपाताच्या गोळ्या केवळ ठरावीक कालावधीतील गर्भधारणेसाठी आणि डॉक्टरांच्या देखरेखीखालीच सुरक्षित असतात. चुकीचा कालावधी, अपुरी तपासणी किंवा चुकीचे डोस घेतल्यास अतिरक्तस्राव, संसर्ग, अपूर्ण गर्भपात आणि जीवघेणा शॉक यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. ग्रामीण भागात गोपनीयतेच्या भीतीने किंवा सामाजिक दबावामुळे अनेक महिला थेट मेडिकलमधून औषधे विकत घेतात. काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या अशा गोळ्यांची विक्रीही होत असल्याची चर्चा आहे.
भारतात कायद्याने ठरावीक अटींनुसार सुरक्षित गर्भपाताची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे महिलांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, अशा निष्काळजीपणाची किंमत जीव गमावून मोजावी लागू शकते.







