छत्रपती संभाजीनगर: मुंबईहून भावाला राखी बांधून छत्रपती संभाजीनगरकडे परतणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुमनांजली गेणुजी बनसोडे (५३, रा. शिवाजीनगर, पाचोड बुद्रुक) यांचा जनशताब्दी एक्स्प्रेसमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. नागरसोल ते तारूर रेल्वे स्थानकादरम्यान गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या बनसोडे यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी जनशताब्दी एक्स्प्रेस तब्बल दोन किलोमीटर मागे नेण्यात आली. मात्र, घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी केलेले शर्थीचे प्रयत्न अपुरे ठरले.

विशेष म्हणजे राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. शिक्षक दिनाच्या अवघ्या दोन दिवस आधी त्यांचा मृत्यू झाल्याने शिक्षण क्षेत्रात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नागरसोल ते तारूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे किलोमीटर ३०/१४-१५ येथे बनसोडे वॉशरूममधून बाहेर आल्यानंतर वॉशबेसिनमध्ये हात धूत होत्या. त्याचवेळी रेल्वेला अचानक जोराचा धक्का बसला. त्यामुळे त्यांचा तोल गेला आणि त्या धावत्या रेल्वेतून बाहेर फेकल्या गेल्या.

हा प्रकार काही प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने आपत्कालीन साखळी ओढून रेल्वे थांबविली. प्रवाशांनी जखमी बनसोडे यांच्याकडे धाव घेतली. ट्रेन मॅनेजरही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली.
बनसोडे यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यासाठी जनशताब्दी एक्स्प्रेस दोन किलोमीटर मागे नेण्यात आली. त्यानंतर जखमी बनसोडे यांना रेल्वेत घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आणण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी तत्काळ रेल्वे सेनेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर माहिती दिली. त्यामुळे रेल्वे आणि पोलिस यंत्रणेला आधीच सतर्क होता आले. जनशताब्दी एक्स्प्रेस छत्रपती संभाजीनगर स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे प्रवासी सेनेचे पदाधिकारी आणि १०८ रुग्णवाहिका स्थानकावर सज्ज ठेवण्यात आली होती.
रेल्वे स्थानकावर गाडी पोहोचताच लोहमार्ग पोलिस हेडकॉन्स्टेबल हरिभाऊ सपने, महिला पोलिस कर्मचारी, रेल्वे प्रवासी सेनेचे पदाधिकारी आणि बनसोडे यांच्या नातेवाइकांनी त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
अपघातानंतर रेल्वे मागे घेण्याची घटना सहसा घडत नाही. मात्र, गंभीर जखमी बनसोडे यांना वेळेत उपचार मिळावेत आणि त्यांचा जीव वाचवता यावा, यासाठी जनशताब्दी एक्स्प्रेस दोन किलोमीटर मागे नेण्यात आली. रेल्वे प्रशासनाने दाखविलेली ही माणुसकी कौतुकास्पद असल्याचे रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी सांगितले.
यापूर्वी अडीच ते तीन वर्षांपूर्वी लासूर-पोटूळदरम्यानही अशीच घटना घडली होती. त्यावेळी धावत्या रेल्वेतून एक पुरुष प्रवासी खाली पडला होता. त्याला तातडीने मदत मिळावी यासाठी तपोवन एक्स्प्रेसही मागे आणण्यात आली होती, अशी माहिती सोमाणी यांनी दिली.
सुमनांजली बनसोडे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापिका म्हणून परिचित होत्या. शाळेला कुटुंब मानून त्यांनी काम केले. विद्यार्थ्यांशीही त्यांनी आपुलकीचे नाते निर्माण केले होते.
त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्यामुळे राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठीही त्यांच्या नावाची शासनाकडे शिफारस करण्यात आली होती. मात्र, हा सन्मान मिळण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
पैठण तालुक्यातील हर्षी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतून बनसोडे यांनी शिक्षणसेवेला सुरुवात केली. त्यानंतर आडुळ जिल्हा परिषद प्रशालेत त्यांची बदली झाली. पुढे लिंबगाव येथे त्यांनी पाच वर्षे सेवा बजावली.
शासनाच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत त्यांची नियुक्ती पाचोड केंद्रांतर्गत मुरमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाली. तेथे मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यांच्या कार्याची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शिफारस झालेली असतानाच झालेल्या या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबीय, विद्यार्थी, सहकारी शिक्षक आणि परिसरावर शोककळा पसरली आहे.







