जालना: महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लाच घेतल्याचे समोर आले आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई न करण्यासाठी तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे ६ हायवा ट्रक आणि १ पोकलेन मशीन अवैध वाळू वाहतुक करत होते. ही अवैध वाळू वाहतुक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आणि कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून, तहसीलदार विजय चव्हाण यांनी तक्रारदाराकडे दरमहा ७ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करणे अशक्य असल्याने, पीडित व्यक्तीने या
बद्दल बीडच्या एसीबी कार्यालयात तक्रार नोंदवली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने अंबड येथे सापळा रचला. वाटाघाटीनंतर लाचेची रक्कम ६ लाख ४० हजार रुपये ठरली. दरम्यान, शनिवारी तहसीलदार यांना पैसे स्वीकारत असतानाच रंगेहात पकडले.






