कोल्हापूर: कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरात एका विवाहितेच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. एका महिन्याच्या चिमुकलीचे बारसे होण्यापूर्वीच महिलेने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना घडली. या प्रकरणात मृत महिलेच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत मुलगी झाल्यामुळे आणि पैशांसाठी छळ केल्याचा दावा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी बाळाचे बारसे करण्याची तयारी सुरू होती. मात्र त्यापूर्वीच अस्मिता यांनी आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेनंतर माहेरच्या कुटुंबीयांनी हा केवळ आत्महत्येचा प्रकार नसून सततच्या मानसिक आणि आर्थिक छळाचा परिणाम असल्याचा आरोप केला आहे.

मृत महिलेच्या आईच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतरपासूनच अस्मिताचा पैशांसाठी छळ केला जात होता. रोख रक्कम तसेच ऑनलाइन पद्धतीनेही पैशांची मागणी करण्यात येत होती. याशिवाय सासरच्या कुटुंबाला मुलगा हवा होता, मात्र मुलगी झाल्याने तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि तिच्यावर मानसिक दबाव टाकला जात होता, असा आरोप त्यांनी केला आहे. बाळाच्या जन्मापूर्वीच मुलासाठी कपडे खरेदी करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.
अस्मिताच्या वडिलांनीही बारशाच्या कार्यक्रमासाठी मोठा खर्च करण्याचा दबाव सासरच्या मंडळींकडून टाकला जात होता, असा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 52 हजार रुपयांचा पाळणा ऑनलाइन मागवण्यात आला होता आणि त्याचा खर्चही माहेरकडून करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
या प्रकरणात सासू, सासरा, पती आणि नणंद यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पंचनामा आणि पुढील चौकशीनंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून सर्व आरोपांची पडताळणी केली जात असून तपासाच्या निष्कर्षानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.







