पुणे, ता. १३ : सोशल मीडियावरील मैत्रीचे प्रेमात रूपांतर होऊन झालेल्या विवाहानंतर पतीकडून मारहाण, पैशांसाठी छळ, दुर्लक्ष आणि दुसरे लग्न केल्याचा संशय व्यक्त करत एका विवाहितेने पतीविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमर कांबळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय विवाहितेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता व अमर कांबळे यांची सन २०२२ मध्ये सोशल मीडियाद्वारे ओळख झाली. त्यानंतर दोघांनी ५ जानेवारी २०२३ रोजी खराडी येथील साईबाबा मंदिरात प्रेमविवाह केला. सुरुवातीला संसार सुखाचा सुरू होता. मात्र २०२४ नंतर पतीच्या वागण्यात बदल झाला आणि किरकोळ कारणांवरून मारहाण व मानसिक छळ सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गर्भावस्थेदरम्यान पतीने त्यांची योग्य काळजी घेतली नाही. तसेच “आई-वडिलांकडून दोन ते तीन लाख रुपये आण” अशी मागणी करत वारंवार शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, मुलाच्या जन्मानंतर पतीच्या मोबाईलवर “आपल्या लग्नाला आज एक महिना झाला” असा संदेश आढळल्याने संशय बळावला. त्यानंतर संबंधित महिलेशी संपर्क साधल्यानंतर पतीचे दुसऱ्या महिलेशी निकटचे संबंध असल्याची माहिती मिळाल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. पुढे सोशल मीडियावरून पती आणि संबंधित महिला एकत्र असल्याचे फोटो व व्हिडिओ मिळाल्याने संशय अधिकच वाढल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
याबाबत जाब विचारल्यानंतर पतीने उडवाउडवीची उत्तरे दिली, तर संबंधित महिलेने शिवीगाळ केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर अनेक वेळा समेटाचे आश्वासन देऊन पुन्हा मारहाण केल्याचेही फिर्यादीचे म्हणणे आहे. लोहगाव पोलीस ठाण्याबाहेरही पतीने हाताने आणि हातातील कड्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीने आपल्या तक्रारीत पतीवर शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप केला असून, त्याचे दुसऱ्या महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या सर्व प्रकाराची दखल घेत संबंधित पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.








