छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचा निधी हटवण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या संतापाच्या वादळात आता राजकीय स्फोट झाला आहे. मंत्री संजय शिरसाटांनी ‘सामाजिक न्याय खातेच बंद करा’ अशी संतप्त गर्जना करताच, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टपणे ‘त्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतील,’ असे सांगत जबाबदारी झटकली.
हा मुद्दा उफाळत असताना अजित पवार छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. पत्रकारांनी थेट सवाल करताच अजितदादांनी कोणतीही भूमिका न घेता फडणवीसांच्या कोर्टात चेंडू टोलवला. अजित पवारांच्या दौऱ्यात पाणीटंचाईचा प्रश्नही तापला. संभाजीनगरमध्ये सर्वाधिक पाणीपट्टी आकारली जाते, तरीही पाण्याचा पुरवठा कोसळलेला. यावर अजित पवारांनी थेट महापालिका आयुक्त व विभागीय आयुक्तांकडे बोट दाखवत, ‘हे तुम्ही त्यांना का विचारत नाही?’ असा सवाल केला. तसेच पुढील बैठकीसाठी विभागीय आयुक्तांना सुभेदारी विश्रामगृहात बोलवण्यात येईल, असेही सांगितले.
हवामान आणि पावसावर भाष्य
अजित पवारांनी सांगितले की, यंदा राज्यात सरासरी १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जो समाधानकारक आहे. दर आठवड्याला कॅबिनेटमध्ये धरणांची व पाणीसाठ्याची माहिती घेऊन आढावा घेतला जातो. टंचाईच्या परिस्थितीत टँकरसंदर्भात तहसीलदारांना सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या चारा टंचाई जाणवत नाही, पण पाण्याची टंचाई आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.