नांदेड: नांदेड शहरात सध्या गुन्हेगारांचे वर्चस्व निर्माण झाल्याचे भीषण चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या अवघ्या 48 तासांत शहरात पाच हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. ताज्या घटनेत, रविवारी सकाळी सोनू कल्याणकर (35) या शिवसेनेच्या (शिंदे गट) सक्रिय कार्यकर्त्याची दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.
सोनू कल्याणकर हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय होते. रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास श्रीनगर भागात 3 ते 4 मारेकऱ्यांनी त्यांना रस्त्यात गाठले. काही कळायच्या आतच त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले. या हल्ल्याची तीव्रता इतकी होती की, सोनू यांचा जागीच मृत्यू झाला.

ही हत्या केवळ वैयक्तिक वादातून झाली की यामागे जुने वैमनस्य आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, सोनू कल्याणकर यांचा इतिहास पाहता याला गँगवॉरची किनार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिंदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याने तीन वर्षांपूर्वी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. सध्या गोलू तुरुंगात असला तरी, या हत्येचे धागेदोरे त्या जुन्या प्रकरणाशी जोडलेले आहेत का, याची चर्चा शहरात सुरू आहे.
गेल्या दोन दिवसांतील घटनाक्रम पाहिला तर नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे स्पष्ट होते:
-
शुक्रवारी रात्री: गँगवॉरमधून अर्जितसिंग, सय्यद आवेझ अरबाज या तिघांचा खून झाला.
-
शनिवारी रात्री: रंजित सिंघ तबेलेवाले या तरुणाची हत्या झाली.
-
रविवारी सकाळी: सोनू कल्याणकर यांची हत्या.
अवघ्या दोन दिवसांत पाच खून झाल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.







