जळगाव : जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहरात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील चोरीच्या प्रकरणात संशय व्यक्त केल्याच्या रागातून एका तरुणाची भोसकून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड शहरातील अन्सार पिंजारी यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. या प्रकरणात त्यांनी त्यांचा परिचित अरबाज शहा याच्यावर संशय व्यक्त केला होता. यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अन्सार यांनी संशय व्यक्त केल्यामुळे अरबाज शहा याने धमक्या दिल्याचा आरोप आहे.

यानंतर अन्सार पिंजारी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी बोदवड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. आरोपीला तातडीने अटक करावी आणि या प्रकरणातील निष्काळजीपणाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
या प्रकरणात आमदार चंद्रकांत पाटील यांनीही हस्तक्षेप करत आरोपीविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून सहाय्यक फौजदार रवींद्र गुरचळ आणि कॉन्स्टेबल मोहन चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणामुळे बोदवड शहरात संतापाचे वातावरण असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास सुरू असून परिस्थितीवर पोलिसांचे लक्ष आहे.







