पुणे: राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळखोरांविरोधात सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आंबेगावातील दूध भेसळ प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. या प्रकरणात नाव जोडले जात असल्याच्या आरोपांवर आंबेगावचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे सविस्तर खुलासा करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, एफडीएच्या कारवाईनंतर काही राजकीय विरोधक जाणीवपूर्वक त्यांचे नाव या प्रकरणाशी जोडून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भेसळ करणारी व्यक्ती, कंपनी किंवा संस्था कोणतीही असो, अशा कोणालाही संरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संबंधित यंत्रणांनी कायद्यानुसार निष्पक्ष आणि कठोर कारवाई करावी, हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी ठाम भूमिका घेत, दूध भेसळ प्रकरणात आपला कोणताही संबंध असल्याचे कोणी सिद्ध केल्यास आपण तत्काळ सार्वजनिक जीवनातून निवृत्त होण्यास तयार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर खोटे आणि बिनबुडाचे आरोप करून बदनामी करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई आणि अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील जनतेचा आपल्यावर विश्वास असल्याचे सांगत, सत्य अखेर समोर येईल आणि विजय सत्याचाच होईल, असा विश्वासही वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते देवदत्त निकम यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली होती. आंबेगाव तालुक्यातील दूध भेसळ प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच फरार आरोपींना तातडीने अटक करून भेसळयुक्त दूध स्वीकारणाऱ्या प्रकल्पांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली होती.
एफडीएच्या कारवाईनंतर हे प्रकरण आता राजकीय पातळीवरही चर्चेचा विषय बनले असून, पुढील तपास आणि कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






