जालना: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून चर्चा आणि समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री जालना जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. मात्र, सरकारची भूमिका समजावून सांगितली जात असल्याने जरांगे काहीसे नाराज झाले. त्यांनी, “तुम्हाला सरकारची बाजू घ्यायची आहे का?” असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांना केला.

यावर अशीमा मित्तल यांनी सरकारची बाजू मांडणे हे आपल्या कामाचा भाग असल्याचे सांगितले. त्यानंतर चर्चेदरम्यान जरांगे यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत तीव्र शब्दांत टीका केली.

मनोज जरांगे पाटील सरकारच्या धोरणांवर टीका करताना, सध्याच्या परिस्थितीमुळे अनेक चांगल्या व्यक्तींवर फाशी घेण्याची वेळ आल्याचे म्हटले, संवाद पुढे सुरू असताना जिल्हाधिकारी मित्तल यांनी नोकरीच्या काळात कोणतीही कठीण परिस्थिती आली तरी त्यासाठी तयार असल्याचे सांगितले. मित्तल पुढे म्हणाले कि, ‘मनोजजी नोकरी करताना फाशी घेण्याची वेळ आली तरी माझी तयारी आहे’, मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर जरांगे यांनी तातडीने त्यांना थांबवले.
“तुम्ही जिल्हाधिकारी आहात, त्यामुळे अशा प्रकारची भाषा करू नका,” असे जरांगे यांनी सांगितले. हा प्रश्न तुमच्या स्तरावरील नसून राज्य सरकारशी संबंधित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे यांनी मित्तल यांचा त्यांच्या पदाबद्दल आणि अभ्यासाबद्दल आदर असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, तुम्ही मेहनत आणि अभ्यास करून UPSC-MPSCच्या माध्यमातून या पदावर पोहोचला आहात. त्यामुळे राज्यस्तरीय राजकीय प्रश्नांमध्ये तुमची ऊर्जा वाया घालवू नका.
सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांना चर्चेसाठी पुढे केले जात असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. “या मागण्यांशी तुमचा थेट संबंध नाही. त्यामुळे तुम्ही या प्रकरणात पडू नका,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पुढे या विषयावर भेटीसाठी येऊ नका, असेही जरांगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.







