जालना: जालन्यातील भोकरदन तालुक्यात जमिनीच्या खरेदी-विक्रीतील फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपळगाव रेणुकाई येथील एका शेतकऱ्याची जमीन त्यांच्या नकळत दुसऱ्याला परस्पर विकल्याचा गंभीर आरोप असून, या प्रकरणात चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी यातील २ मुख्य आरोपींना अटक केली असून, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर कैलास देशमुख हे या जमिनीचे मूळ मालक आहेत. त्यांच्या वडिलांच्या नावावर गट क्रमांक 789 मध्ये १ हेक्टर जमीन होती. मुख्य आरोपी परमेश्वर कैलासराव देशमुख याने अत्यंत चलाखीने बनावट कागदपत्रे तयार केली. त्याने चक्क राजपत्रात स्वतःचे नाव बदलून ‘परमेश्वर’ ऐवजी ‘ज्ञानेश्वर’ असे करून घेतले आणि याच नावाच्या आधारे त्याने १० जून 2026 रोजी 80 आर जमीन शिंदूबाई पंडितराव देशमुख यांच्या नावे खरेदीखत करून दिली. या फसवणुकीच्या व्यवहारात पंडितराव माधवराव देशमुख आणि सागर गजानन देशमुख यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्या.

जेव्हा ऑनलाईन फेरफार प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा गावकऱ्यांकडून माहिती मिळाल्यावर मूळ मालक ज्ञानेश्वर देशमुख यांना आपल्या जमिनीची परस्पर विक्री झाल्याचे समजले. धक्का बसलेल्या ज्ञानेश्वर यांनी तातडीने २४ जून रोजी तलाठी कार्यालयात धाव घेऊन ही फेरप्रक्रिया रोखली आणि भोकरदन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत आणि त्यांच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार सागर गजानन देशमुख आणि आरोपी परमेश्वर कैलासराव देशमुख यांना पोलिसांनी अटक केली आहे.







