पुणे: पुणे येथील केतन अग्रवाल हत्याकांडाचा तपास आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील घटनास्थळी नेऊन सखोल चौकशी केली. काल रात्री ११ वाजता दोन्ही आरोपींना गडाच्या पायथ्याशी आणून, त्यांनी हत्येच्या दिवशी नक्की कोणता मार्ग वापरला होता, याची पोलिसांनी उलटतपासणी केली. आता पोलीस या कटाचा छडा लावण्यासाठी सियाच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यास प्राधान्य देत आहेत.

या तपासादरम्यान सियाचा भाऊ साहिल गोयल याने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. सियाने आपल्या कुटुंबीयांना केतन अग्रवालशी लग्न करण्याची इच्छा नाही, असे कधीही सांगितले नव्हते. उलट, ती लग्नासाठी आनंदाने तयार असल्याचे भासवून सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकत होती. जर तिने सुरुवातीलाच लग्नाला विरोध दर्शवला असता, तर तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर लग्नाची सक्ती केली नसती, असे साहिलने स्पष्ट केले आहे. यामुळे सियाचा ‘कुटुंबाच्या दबावामुळे हे केले’ हा दावा आता पूर्णपणे खोटा ठरला आहे.

सिया आणि चेतन यांची ओळख सियाचा भाऊ साहिल आणि चेतन यांच्यातील क्रिकेट मैत्रीमुळे झाली होती. साहिलसोबत क्रिकेट खेळायला जाताना सियाची चेतनशी ओळख झाली आणि पुढे त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. पोलिसांच्या तांत्रिक तपासात असे आढळले आहे की, गेल्या काही महिन्यांत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल 2,040 फोन कॉल्स झाले असून, त्यांचा संवाद सुमारे 238 तासांचा होता.
केतन अग्रवालचे टक्कल असणे आणि तो बोलताना अडखळणे या गोष्टी सियाला आवडत नव्हत्या. हे माहीत असूनही ती केतनशी लग्नाचे नाटक करत होती, कारण तिचे प्रेम चेतनवर होते. अखेर, 18 जून रोजी वाढदिवसाच्या बहाण्याने तिने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले आणि तिथे आधीच दबा धरून बसलेल्या चेतनच्या मदतीने त्याला खोल दरीत ढकलून निर्घृण हत्या केली. आता पोलीस या संपूर्ण कटातील प्रत्येक दुवा तपासत असून, लवकरच यातील सर्व सत्य समोर येईल.







