बीड : बीड जिल्ह्यात जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जमाव बंदीचे आदेश दिले आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. दोन किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली असून नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात गेल्या गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या प्रश्नावर नागरिक जमू लागले आहेत. त्याचबरोबर १५ फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे सामूहिक साखळी उपोषणासाठी बसणार होते. त्या अनुषंगाने आणि बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात अनेक सामाजिक संघटना न्याय मागण्यासाठी एकत्र येऊ लागल्या आहेत.

तसेच जिल्ह्यात सध्या दहावी आणि बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून दहावीची परिक्षा २१ फेब्रुवारीपासून चालू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हे जमाबंदी लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. १५ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत हा आदेश लागू असेल. त्यामुळे या आदेशानुसार २ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही, असं आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आदेशात नेमकं काय?
पोलिस अधीक्षक बीड यांच्या अहवालावरून बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) प्रमाणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणीही लाठी, काठी, बंदूक, तलवार, कोणतेही ज्वलनशील पदार्थ जवळ बाळगणार नाहीत असे झाल्यास आपल्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.







