बीड: बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच नवरदेवाने भर मंडपातूनच लग्न अर्धवट सोडून पळ काढल्याची घटना घडली. या प्रकरणी सुमारे 100 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, राज्यात बालविवाहावर बंदी असतानाही ग्रामीण भागात अशा घटना अद्यापही छुप्या पद्धतीने घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. (Beed News)

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरालगतच्या कपिलधार येथील एका मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचत सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी विवाह सोहळा सुरू असल्याचे दिसून आले. मात्र पोलिसांनी घटनास्थळी प्रवेश करताच नवरदेवाने मंडपातूनच पलायन केले.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, त्यावरून प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात वधू-वराचे आई-वडील, जवळचे नातेवाईक, वराडी मंडळी, तसेच कपिलधार देवस्थानच्या विश्वस्तांसह सुमारे 100 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे चित्र असून, ते रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार झालेल्या नवरदेवाचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात बालविवाहावर कायदेशीर बंदी असतानाही अशा घटना कशा घडतात, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.







