छत्रपती संभाजीनगर: वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने एकीकडे विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नीपीडित संघटनेने नेहमीप्रमाणे वेगळाच उपक्रम राबवला. वटसावित्रीच्या आदल्या दिवशी संघटनेच्या सदस्यांनी ‘पिंपळपौर्णिमा’ साजरी करून आपल्या मागण्या अनोख्या पद्धतीने मांडल्या. या उपक्रमामुळे शहरात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सदस्यांनी पिंपळाच्या झाडाभोवती 108 उलट्या प्रदक्षिणा घालून यमदेवाला प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेत, “पुढच्या जन्मात किंवा सात जन्मातही हीच पत्नी मिळू नये,” अशी भावना व्यक्त करण्यात आली. हा उपक्रम पाहण्यासाठी अनेक नागरिकांनीही गर्दी केली होती.

पत्नीपीडित संघटनेमुळे पत्नींकडून मानसिक, कौटुंबिक किंवा इतर प्रकारचा त्रास झाल्याचा दावा करणारे अनेक पुरुषही समाजात आहेत असे दिसते. अध्यक्ष ॲड. भरत फुलारे यांच्या मते, पुरुषांनाही न्याय मिळावा, त्यांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकल्या जाव्यात आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदेशीर संरक्षणाची व्यवस्था व्हावी, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. या विषयाकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.







