मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) जलविभागातील एका अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. अंधेरी पश्चिम येथील ‘के/पश्चिम’ विभागातील जलमापक पर्यवेक्षकाला 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महापालिकेच्या विभागांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणात विनोद भगवान राठोड यांना अटक करण्यात आली आहे. तर नंदन बाळकृष्ण मोरे फरार असून, दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या दुकानासाठी पाणी मीटर बसवणे आणि पुनर्नळ जोडणी मिळवण्यासाठी 20 जुलै 2026 रोजी महापालिकेकडे अर्ज केला होता. हे काम करून देण्यासाठी जलमापक पर्यवेक्षक विनोद भगवान राठोड आणि जलमापक निरीक्षक नंदन बाळकृष्ण मोरे यांनी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सुरुवातीला या कामासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, चर्चेनंतर 80 हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. यातील पहिला हप्ता म्हणून 40 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.

तक्रार मिळाल्यानंतर एसीबीने 29 जुलै रोजी या प्रकरणाची पडताळणी केली. त्यावेळी जलमापक निरीक्षक नंदन मोरे यांनी तक्रारदाराला 40 हजार रुपये जलमापक पर्यवेक्षक विनोद राठोड यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर एसीबीच्या पथकाने एस. व्ही. रोडवरील ‘टॉप-10 मोबाईल शॉप’समोरील फुटपाथवर सापळा रचला. पंचांच्या उपस्थितीत विनोद राठोड यांनी 40 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही कारवाई पार पडली.
दरम्यान, एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही सरकारी कामासाठी लाच मागितल्यास तातडीने विभागाशी संपर्क साधावा आणि भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करावी.







