मुंबई: मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात भरधाव कारने रस्त्यावरील नागरिकांना चिरडल्याची भीषण घटना रविवारी रात्री घडली. एस. व्ही. रोडवरील मामलतदार वाडी रोड जंक्शनजवळ झालेल्या या अपघातात प्राथमिक माहितीनुसार सुमारे २० जणांना कारने धडक दिली. या दुर्घटनेत अॅड. प्रियांका मयंक सत्रा यांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कार मालाड सबवेच्या दिशेने भरधाव वेगाने येत होती. मामलतदार वाडी रोड जंक्शनजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने रस्त्यावर असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिली. कारचे चाक प्रियांका सत्रा यांच्या अंगावरून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका जखमीच्या डोक्याला सुमारे २० टाके पडल्याची माहिती आहे. मात्र, जखमींची नेमकी संख्या आणि त्यांची प्रकृती याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दरम्यान, मालाड पोलिसांनी अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहनाचा वेग किती होता, चालकाचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले आणि अपघाताच्या वेळी चालकाने मद्यपान केले होते का, याचा तपास सुरू आहे. मद्यपानाबाबतचा निष्कर्ष वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणाला आता आणखी एक गंभीर वळण मिळाले आहे. मृत प्रियांका सत्रा यांच्या कुटुंबीयांनी आरोपी चालकाला पोलीस ठाण्यात कथित ‘VIP ट्रीटमेंट’ दिल्याचा आरोप केला आहे. आरोपीला मोबाइल वापरण्याची आणि खुर्चीवर बसण्याची परवानगी देण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तसेच रात्री सुमारे १.२० वाजता वैद्यकीय तपासणीच्या कारणास्तव त्याला लॉकअपमधून बाहेर काढून पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या वातानुकूलित खोलीत बसवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नसून मालाड पोलिसांचे अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे आरोपीला अशा प्रकारची कोणतीही विशेष सुविधा देण्यात आली होती का, याची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.
मृत महिलेच्या कुटुंबीयांनी निष्पक्ष तपासासह आरोपीवर योग्य आणि कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच कथित विशेष वागणुकीची स्वतंत्र चौकशी, पोलिसांकडून हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई आणि अपघातस्थळापासून पोलीस ठाण्यापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, वाहनाची तांत्रिक तपासणी आणि वैद्यकीय अहवालातून या भीषण दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.






