पुणे: नांदेडच्या किनवट तालुक्यातील तोटंबा घाटात भाविकांच्या कमांडर जीपला भीषण अपघात झाला. सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या प्रवाशांच्या जीपचा हा अपघात झाला असून, या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील कुबीर मंडळातील पारडी येथील काही नागरिक सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपल्यानंतर ते कमांडर जीपने तेलंगणाकडे परतत होते. याचदरम्यान तोटंबा घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.

धडक इतकी भीषण होती की, जीपमधील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जीपमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी तेलंगणातील कुबीर येथे हलवण्यात आले आहे.

अपघातग्रस्त कमांडर जीप सहस्रकुंड ते तेलंगणा या मार्गावर नियमित प्रवासी वाहतूक करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील माहिती घेतली जात आहे. या दुर्घटनेमुळे सहस्रकुंड परिसरासह तेलंगणातील पारडी आणि कुबीर परिसरातही शोककळा पसरली आहे.







