विशाल शिंदे

नसरापूर : पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील सारोळे परिसरातील काही नामांकित हॉटेलांवर अन्न सुरक्षा व मानके विभागाने (अन्न भेसळ प्रतिबंधक विभाग) नुकतीच धडक तपासणी करून अन्नपदार्थांचे नमुने घेतले. सुमारे दोन तास चाललेल्या या कारवाईमुळे महामार्गावरील हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. कारवाईची माहिती वाऱ्यासारखी पसरताच अनेक हॉटेल व्यावसायिक, स्वीट होम चालक आणि खाद्य व्यवसायिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ आपली आस्थापने बंद ठेवली. तपासणीदरम्यान तीन ते चार हॉटेलांची पाहणी करण्यात आली. अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले असून, किरकोळ त्रुटी आढळलेल्या आस्थापनांना नोटिसा बजावल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या कारवाईत कोणतेही हॉटेल सील करण्यात आले नसले, तरी या धडाकेबाज तपासणीमुळे संपूर्ण महामार्गावरील खाद्य व्यवसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.

या कारवाईनंतर अनेक हॉटेल व्यावसायिकांनी स्वयंपाकगृहांची स्वच्छता, भांडी, कढया, खाद्यतेल, अन्नपदार्थांची गुणवत्ता, फ्रीज, टेबल, स्वच्छतागृहे तसेच स्वीट होममधील खाद्यपदार्थांच्या साठवणुकीकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यामुळे छोट्या-मोठ्या खाद्य व्यावसायिकांमध्येही स्वच्छता आणि दर्जेदार अन्नपुरवठ्याबाबत जागरूकता वाढल्याचे चित्र दिसून आले.
मात्र, सारोळे परिसरात ज्या पद्धतीने अन्न सुरक्षा विभागाने कारवाई केली, त्याच धर्तीवर पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर, कापूरहोळ, केळवडे, नसरापूर तसेच संपूर्ण हायवे पट्ट्यातील हॉटेल्स, ढाबे, स्वीट होम, फास्टफूड सेंटर, पानटपऱ्या, चहाच्या टपऱ्या आणि हातगाड्यांचीही तातडीने तपासणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, खेड शिवापूर, कापूरहोळ, केळवडे आणि नसरापूर हा परिसर राजगड, तोरणा, सिंहगड परिसर, बनेश्वर मंदिर, वरंधा घाट, भोर तालुका तसेच अनेक पर्यटन व धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी मुख्य मार्ग आहे. वर्षभर हजारो पर्यटक, भाविक आणि प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. अनेक पर्यटक याच परिसरातील हॉटेल्स, ढाबे, फास्टफूड सेंटर, हातगाड्या आणि पानटपऱ्यांवर खाद्यपदार्थ खरेदी करून पुढील प्रवास करतात. त्यामुळे या भागात विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा, स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबत प्रशासनाने नियमित तपासणी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे नागरिक सांगत आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे की, अनेक ठिकाणी अन्नपदार्थ कोणत्या परिस्थितीत तयार केले जातात, वापरण्यात येणारे खाद्यतेल किती दिवस वापरले जाते, कालबाह्य साहित्याचा वापर होतो का, अन्नामध्ये भेसळ केली जाते का, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता काय आहे, स्वयंपाकगृहांची स्वच्छता राखली जाते का, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते का, फूड सेफ्टी लायसन्स आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, नसरापूर परिसरात मोठ्या हॉटेल्सबरोबरच महामार्गालगत असलेल्या छोट्या ढाब्यांमध्ये, फास्टफूड सेंटरमध्ये, वडापाव, भजी, पाणीपुरी, ज्यूस सेंटर, पानटपऱ्या आणि इतर हातगाड्यांवर मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विकले जातात. या सर्व आस्थापनांचीही अन्न सुरक्षा विभागाने तपासणी करून नियमांचे पालन होत आहे का, याची खात्री करावी, अशी मागणी होत आहे.
शाळा, महाविद्यालये आणि गर्दीच्या ठिकाणांजवळ उभ्या असलेल्या वडापाव, भेळ, पाणीपुरी व इतर खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाड्यांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज असल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी नियमित तपासणी मोहीम राबविण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नसरापूर परिसरात आजपर्यंत अन्न सुरक्षा विभागाकडून मोठ्या प्रमाणावर धडक तपासणी झाल्याचे फारसे दिसून आलेले नाही. त्यामुळे सारोळेप्रमाणेच नसरापूर, कापूरहोळ, केळवडे, खेड शिवापूर आणि संपूर्ण महामार्ग पट्ट्यात विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी वाढत आहे.
याशिवाय काही नागरिकांचा दावा आहे की, काही हॉटेल्समध्ये नियमबाह्य प्रकार सुरू असल्याच्या तक्रारीही वेळोवेळी समोर येतात. अशा तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करावी. फूड लायसन्स नसलेल्या, अस्वच्छ परिस्थितीत व्यवसाय करणाऱ्या किंवा ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून आवश्यक असल्यास त्यांना सील करावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
“सारोळे येथे कारवाई झाली, तर खेड शिवापूर, कापूरहोळ, केळवडे आणि नसरापूरमध्ये का नाही?” असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी अन्न सुरक्षा व मानके विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण पर्यटन मार्गावर विशेष तपासणी मोहीम राबवून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सारोळे येथील कारवाई ही स्वागतार्ह असली, तरी ती केवळ एका भागापुरती मर्यादित न राहता संपूर्ण पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील पर्यटन मार्गावर विस्तारली जाणे आवश्यक आहे. खेड शिवापूर, कापूरहोळ, केळवडे आणि नसरापूर ही हजारो पर्यटकांची वर्दळ असलेली महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे या परिसरातील प्रत्येक खाद्य व्यवसायाची नियमित तपासणी, अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि परवान्यांची पडताळणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे ही काळाची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.








