पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली असून, शहरातील विविध नागरी समस्यांवरून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढत जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच शहरातील कचरा व्यवस्थापनावर निषेध व्यक्त करण्यासाठी महापालिकेच्या गेटसमोर कचरा टाकण्यात आला. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत शहरातील स्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. काही कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या गेटवर चढून आंदोलन अधिक तीव्र केल्याचेही पाहायला मिळाले.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे महापालिका प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत आहे. शहरातील कचरा व्यवस्थापन, खराब रस्ते, पाणीपुरवठ्याच्या समस्या आणि इतर नागरी सुविधांबाबत प्रभावी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रशासनाने तातडीने शहरातील समस्या सोडवाव्यात, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

दरम्यान, राज्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांची सत्ता असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये मतभेद दिसून आले आहेत. काही महापालिकांमध्ये निवडणुकांदरम्यान दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले होते. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी एकत्र आले असले, तरी स्थानिक पातळीवरील विविध मुद्द्यांवर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद कायम असल्याचे या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.







