बीड: दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यात सध्या एका विहिरीची जोरदार चर्चा सुरू आहे. भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या घोगस पारगाव शिवारातील एका विहिरीत अचानक मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. विशेष म्हणजे आसपासच्या इतर विहिरी कोरड्या असताना या एका विहिरीत पाणी आल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

ही विहीर भगवानगडाच्या मालकीच्या जागेत आहे. 1 सप्टेंबर रोजी विहीर अचानक पाण्याने भरल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्याच दिवशी भगवानगडावर संत भगवान बाबा यांचा जयंती सोहळा सुरू होता. त्यामुळे या घटनेची भाविकांमध्ये विशेष चर्चा रंगली आहे.

भगवानगड परिसरात यापूर्वी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. मंदिराच्या बांधकामासाठीही पाण्याची कमतरता जाणवत होती. मात्र, या विहिरीत अचानक पाणी आल्याने काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.

या घटनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विहिरीपासून अवघ्या 100 फुटांवर असलेल्या इतर विहिरींमध्ये अद्याप पाणी नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या विशिष्ट विहिरीतच अचानक पाणी कुठून आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विहिरीत पाणी आल्याची माहिती पसरताच ती पाहण्यासाठी भाविक आणि नागरिकांची गर्दी होत आहे. काही जण याकडे निसर्गाचा चमत्कार म्हणून पाहत आहेत, तर यामागे नेमके भूगर्भीय कारण काय आहे, याचा शास्त्रीय पद्धतीने तपास करण्याची मागणीही होत आहे.
यंदा बीड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती आहे. नदी, नाले आणि ओढ्यांमध्येही पाण्याची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या विहिरीत अचानक पाणी आल्याने हा विषय सध्या परिसरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.







