पुणे : पुण्यात एका 26 वर्षीय तरुणाने मानसिक छळाला कंटाळून राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याच समोर आलं आहे. मित्रांच्या त्रासाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचललं असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद भाऊसाहेब जाधव (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथील रहिवासी होता. शिक्षण व कामाच्या निमित्ताने तो पुण्यातील नऱ्हे येथील मोकारवाडी परिसरात असलेल्या एका वसतिगृहात राहत होता.

25 ऑगस्ट रोजी प्रसादने आपल्या खोलीतील पंख्याला शाल बांधून जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पोलिसांना तेथे एक सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीमध्ये प्रसादने त्याच्या एका मैत्रिणीचे आणि तिच्या मित्राचे नाव स्पष्टपणे लिहिले होते. या दोघांकडून सतत होणाऱ्या तीव्र मानसिक आणि त्रासामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केले होते.

मुलाच्या या अकल्पित आणि दुर्दैवी मृत्यूमुळे जाधव कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. प्रसादचे 63 वर्षीय वडील भाऊसाहेब जाधव यांनी याप्रकरणी तातडीने पोलिसांत तक्रार नोंदवली. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे नऱ्हे पोलिसांनी संबंधित मैत्रीण आणि तिच्या मित्राविरोधात तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे नऱ्हे परिसरात मोठी खळबळ उडाली असून तरुणाच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या महिला पोलीस उपनिरीक्षक नम्रता सोनवणे या प्रकरणी पुढील अधिक तपास करत असून आरोपींवर योग्य ती कारवाई केली जात आहे.






