Maharashtra Conversion Act Draft : मुंबई : सक्तीचे किंवा फसवणुकीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीने या कायद्याचा पहिला मसुदा तयार केला आहे. हा मसुदा पुढील तपासणीसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. (Love Jihad Act Maharashtra)

फेब्रुवारी 2025 मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीत महिला व बालविकास, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास तसेच गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. आतापर्यंत 2 ते 3 बैठका घेण्यात आल्या असून विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. हा कायदा केवळ राजकीय भूमिका म्हणून नव्हे, तर कायदेशीरदृष्ट्या मजबूत आणि टिकणारा असावा यावर भर दिला जात आहे.

कायद्यांचा सखोल अभ्यास
समितीने राज्यातील विद्यमान परिस्थितीचा आढावा घेतला आहे. प्रेमसंबंधाच्या नावाखाली फसवणूक करून किंवा दबाव टाकून धर्मांतर केल्याच्या तक्रारींचा अभ्यास करण्यात येत आहे. तसेच देशातील इतर राज्यांमधील धर्मांतरविरोधी कायद्यांचा सखोल अभ्यासही केला जात आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये अशा प्रकारचे कायदे लागू आहेत. त्या कायद्यांतील तरतुदींचा विचार करून महाराष्ट्रासाठी योग्य आराखडा तयार केला जात आहे.

कायदा संवेदनशील असल्याने सरकार सावधपणे पावले टाकत आहे. सर्व बाजूंचा विचार करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. मसुद्यावर विधी व न्याय विभागाचे मत घेतल्यानंतर त्यात आवश्यक बदल केले जाऊ शकतात. त्यानंतरच अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेकडे सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात लक्ष लागले आहे.






