खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड शहराजवळ असलेल्या जगबुडी नदीच्या पुलावर एक अतिशय भीषण अपघात (Accident) झाला आहे. मुंबईहून लोटे एमआयडीसीच्या दिशेने घातक रसायन घेऊन जाणारा एक टँकर भरणे नाका परिसरात अचानक पलटी झाला. या अपघातामुळे टँकरमध्ये असलेले इथेनॉल हे ज्वलनशील केमिकल मोठ्या प्रमाणात सांडू लागले आहे. हे घातक रसायन थेट पुलाखालून वाहणाऱ्या जगबुडी नदीच्या पात्रात मिसळल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा टँकर अतिशय धोकादायक रसायनाची वाहतूक करत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. टँकर पलटी झाल्याचा फटका इतका जोरात होता की, त्यामधून हजारो लिटर केमिकलची गळती सुरू झाली. हे सर्व रसायन थेट नदीत सांडल्यामुळे नदीचे पाणी पांढरट झाले असून संपूर्ण परिसरात रसायनाचा उग्र वास पसरला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्याच भागात खेड शहराला आणि आसपासच्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे आता हे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही, परिणामी अनेक गावांचा पाणीपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने बंद करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टँकरमधील रसायन हे लवकर पेट घेणारे असल्याने मोठी आग लागण्याची शक्यता होती, त्यामुळे पुलावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. ही गळती थांबवण्यासाठी लोटे एमआयडीसीमधील तज्ज्ञांच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. केमिकलच्या उग्र वासामुळे आजूबाजूच्या नागरिकांना आणि प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी न जाण्याचे आवाहन केले असून क्रेनच्या साहाय्याने टँकर बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.







