CM Devendra Fadnavis : अमरावती : राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात 2026 पर्यंत दिवसा 12 तास मोफत सौर वीज (Solar Power) पोहोचवण्याचे काम शासन करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांच्या वतीने डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यांत्रिकीकरणाचा वापर वाढवण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे शेती अधिक फायदेशीर होऊ शकते. हवामानातील बदलांचा परिणाम कमी करण्यासाठीही आधुनिक तंत्रज्ञान उपयोगी ठरत आहे. पुणे येथे झालेल्या एका कृषी कार्यक्रमात विविध कृषीआधारित स्टार्टअप पाहण्याची संधी मिळाली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने हवामानाचा अभ्यास करून पिकांवर येणाऱ्या किडींची माहिती आधीच शेतकऱ्यांना मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, अवघ्या एका महिन्यात सर्वाधिक सौर कृषी पंप बसवण्याचा जागतिक विक्रम राज्याने केला आहे. 2026 पर्यंत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा 12 तास मोफत सौर वीज देण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे कोरडवाहू शेती बागायतीत रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट शासनाने घेतले आहे.
नदीजोड प्रकल्पांतर्गत सुमारे 500 किलोमीटर नवीन नदी प्रवाह तयार करण्यात येणार असून, पश्चिम महाराष्ट्रातील खारपान पट्टे आणि दुष्काळग्रस्त भागांना सिंचन सुविधा मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या सोडवण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, स्मार्ट आणि मॅग्नेट योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. देशात सर्वांना अन्न मिळावे, यासाठी त्यांनी कृषी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले, असेही यावेळी सांगण्यात आले.







