पुणे : उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लहान मुलांमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली आहे. हडपसर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारने गुन्ह्यांसाठीची वयोमर्यादा 18 किंवा 21 वरून कमी करण्याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन केले. गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असेल, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

पुण्यातील नाना पेठ येथे झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी बालगुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘मी काही वरिष्ठ अधिकारी आणि केंद्र सरकारच्या मान्यवरांशी या विषयावर चर्चा केली आहे. लहान वयातच मुले खुनासारखे गंभीर गुन्हे करत आहेत. त्यामुळे कायद्यात आवश्यक बदल करून, त्यांचे वय कमी असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.’ असं अजित पवार यावेळी म्हणाले.
आयुष हत्या प्रकरणावर बोलताना पुढे म्हणाले, ‘पोलीस आयुक्तांनी तातडीने कारवाई करून अनेक आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर ‘मकोका’ लावण्यात आला आहे. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाशिवाय पारदर्शक तपास करावा, अशा सूचना देण्यात आल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, आयुष कोमकर प्रकरणी पुणे पोलिसांनी तपास तीव्र केला असून, नुकतीच मोठी कारवाई करत या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे.







