पुणे: हॉटेलमध्ये कुटुंबासह जेवणासाठी गेलेल्या एका महिलेला दिलेल्या सूपमध्ये झुरळ सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना वानवडी भागातील भिवंडी दरबार हॉटेलमध्ये घडली असून, याप्रकरणी वानवडी पोलिसांनी हॉटेलचे व्यवस्थापक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी अश्विनी रवी शिरसाट (वय ३१, रा. दापोडी, मुंबई-पुणे रस्ता) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, भिवंडी दरबार हॉटेलमधील व्यवस्थापक अमन हुसेन शेख (वय २४, रा. आझादनगर, भिवंडी) याच्यासह हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शिरसाट कुटुंबीय १६ जून रोजी रात्री जेवणासाठी वानवडीतील भिवंडी दरबार हॉटेलमध्ये गेले होते. जेवण सुरू करण्यापूर्वी त्यांना सूप दिले गेले. मात्र, त्यांनी दिलेल्या सूपमध्ये झुरळ आढळल्याने त्यांनी तात्काळ हॉटेल व्यवस्थापक आणि कामगारांना जाब विचारला. मात्र, या घटनेची त्यांनी केवळ सारवासारव केली आणि जबाबदारी टाळली.
फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की, हॉटेल व्यवस्थापनाने भटारखान्यात स्वच्छतेची कोणतीही काळजी घेतली नाही आणि ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, असे पदार्थ सर्व्ह केले. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २७५ नुसार (भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार कुंभार करत आहेत.
यापूर्वी विश्रांतवाडी भागातही अशाच स्वरूपाची घटना घडली होती. एका कॅफेमधून मैत्रिणीसाठी मागवलेल्या चॉकलेट शेकमध्ये मृत उंदीर आढळून आला होता. या प्रकरणीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संबंधित हॉटेल व्यवस्थापनाला स्वच्छतेसंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शहरातील अनेक भागांत गाड्यांवर खाद्यपदार्थ विक्री होत असून, या ठिकाणी स्वच्छतेची पातळी अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. दुषित पाण्याचा वापर व स्वच्छतेची कमतरता ही समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. प्रशासनाने याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.







