पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती: शिरुर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे यंदा तालुक्यात उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात गेल्या काही वर्षात मे महिन्यात पहिल्यांदाच सरासरी सुमारे १८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर पाबळ, निमोणे व न्हावरा या मंडल भागातील गावातून सुमारे २०० हुन अधिक मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जोरदार पाऊस झाला. परंतू परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यात धामारी, केंदूर, पाबळ, कान्हूर मेसाई, खैरेवाडी व परिसरात लवकरच पाणीटंचाई जाणवू लागली होती. त्याच दरम्यान तालुक्यात पावसाने ५ मे पासून हजेरी लावली. सुरुवातीला अवकाळी म्हणून हजेरी लावलेल्या पावसाने पाणीटंचाई निर्माण झालेल्या अनेक गावांना आणि भागांना दिलासा मिळाला आहे.
सततच्या पावसाने चास कमान व भीमा नदीच्या लाभक्षेत्रामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्याचवेळी सततच्या पावसामुळे शेतात गवत मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. चोवीस तालुक्यात सरासरी ८१.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
शिरुर तालुक्यात १ मे ते २५ मे पर्यंत पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये), टाकळी हाजी-९६.८, रांजणगाव गणपती१११, मलठण-१११, शिरुर-१३६.२, कोरेगाव भीमा-१५२, वडगाव रासाई-१६२. ८, तळेगाव ढमढेरे-१९३.२, निमोणे-२७१.१, न्हावरा-२८५.५, पाबळ-२९८







