यवत: यवत राहू रस्त्यावर असलेल्या रेल्वे पुलाजवळ ओढ्याला पूर आल्याने यवत राहू हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला असून प्रचंड पाणी साचले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भुलेश्वर डोंगर रांगांमध्ये प्रचंड पाऊस झाल्याने पावसाचे पाणी यवत गावातील ओढातून वाहत आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने नुकतेच ओढा बंदिस्त केला आहे हेच पाणी पुढे चोभे वस्ती जवळ असलेल्या रेल्वे पुलाजवळ जाते परंतु गेल्या अनेक वर्षापासून या ओढ्याची दुरुस्ती व साफसफाई झाली नसल्याने ओढ्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आले असून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असल्याने चोभे वस्ती, कटके वस्ती, दुधाने चौक मार्गे राहू यासह उत्तरेकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा वळसा घालावा लागत आहे.

यवत, राहू यांसह आजूबाजूच्या गावांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असून संबंधित प्रशासनाने ओढ्याचे पाणी रस्त्यावरून जाणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणी यवत परिसरातील नागरिक व शेतकरी करीत आहेत. ओढ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून दुचाकीस्वार मात्र जीवावर उदार होऊन पाण्यातून प्रवास करत आहेत.







