पुणे : पुणे आतरंराष्ट्रीय विमानतळावर नुकतीच एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. पुणे -जयपूर मार्गांवरील एअर इंडिया एक्सप्रेस हे विमान उड्डाणासाठी धावपटीवर वेगाने धावत अचानक भटका कुत्रा समोर आल्यामुळे पायलटला अगदी शेवटच्या क्षणी इमर्जन्सी ब्रेक लावावा लागला. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पायलटच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.

ही घटना शुक्रवारी दुपारी 3:15 वाजता घडली. एअर इंडिया एक्सप्रेसचे हे विमान एकूण 120 प्रवाशांना घेऊन जयपूरसाठी उड्डाण करणार होते. विमानाने धावपट्टीवर वेग घेतला होता, तितक्यात एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या कर्मचाऱ्यांना तिथे एक कुत्रा फिरताना दिसला. त्यांनी ताबडतोब धोक्याची सूचना दिल्यानंतर पायलटने तातडीने ब्रेक दाबले. अचानक लागलेल्या या जोरदार ब्रेकमुळे विमानातील प्रवासी घाबरले आणि आतमध्ये काही वेळ गोंधळ उडाला.

ब्रेक लावल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून विमानाची संपूर्ण तांत्रिक तपासणी करण्यात आली. सर्व यंत्रणा सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यावर, सुमारे 100 मिनिटांच्या उशाराने म्हणजेच दुपारी 4:55 वाजता विमानाने जयपूरसाठी यशस्वी उड्डाण केले. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
विशेष म्हणजे, पुणे विमानतळावर अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 28 जून रोजी देखील भुवनेश्वरहून आलेल्या एका विमानासमोर कुत्रा आल्यामुळे वैमानिकाला ‘गो-अराउंड’ करावे लागले होते.
आता लागोपाठ घडणाऱ्या या प्रकारांमुळे आता पुणे विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि तिथे असणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या वावरावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.





