पुणे: काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्यातील दोघे रहिवासी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी पुण्यात परत आणण्यात आले आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे अनेक वर्षांपासून जवळचे मित्र होते. त्यांचे कुटुंब एकत्र काश्मीरला गेले होते. दरम्यान, दहशवादी हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोघा मित्रांचे पार्थिव आज पुण्यात आणल्यानंतर मृतदेह पाहून कुटुंबियांचे अश्रू थांबत नव्हते. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत एकत्रित अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली आहे. दोघांवर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यासाठी अंत्यविधीची तयारी करण्यात येत आहे.
संतोष जगदाळे यांच्या 86 वर्षीय आईला मुलाच्या मृत्यूच्या बातमीने धक्का बसला. संतोष यांची आई मुलाच्या काश्मीरहून परतण्याची आतुरतेने वाट पाहत होती. दरम्यान, हि दुखद घटना घडली. त्यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची दुःखद बातमी मिळाली. संतोष यांनी आईला भेटवस्तू आणतो म्हणून सांगितले आणि आज त्यांचा मृतदेहाच समोर आल्याने आईने हंबरडा फोडला. हे दृश पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. कौस्तुभ गणबोटे यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे, दरम्यान, पुण्यातील दोन तरुणांच्या मृत्यूने नागरिक शोक व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे काश्मीरमधील पर्यटकांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.