शिरूर: तळेगाव-न्हावरे रस्त्यावरील (Pune News) तिरंगा हॉटेलमध्ये खराब व सडलेले मासे (Shirur News) खाण्यास दिल्याचा आरोप एका ग्राहकाने केला असून, त्यांने या प्रकाराचा एक व्हिडीओ बनवून हॉटेलच्या निष्काळजीपणाबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला आहे. हॉटेल प्रशासनकडून शिळे आणि खराब झालेले अन्न पदार्थ ग्राहकांच्या माथी मारून त्याच्या आरोग्याची खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या हॉटेल भोंगळ कारभारावर अन्न व औषध प्रशासन कारवाईचा बडगा उगारणार का? की नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करून अशा हॉटेल चालकांना पाठीशी घालणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सविस्तर वृत्त असे की, दोन युवक आणि एक चिमुकली मास्यावर ताव मारण्यासाठी प्रसिद्ध हॉटेलमध्ये शुक्रवारी (ता.7) रात्रीच्या सुमारास गेले होते. त्यांनी दोन अनलिमिटेड मास्यांच्या थाळीची ऑर्डर दिली. त्यानंतर जेवण आल्यानंतर मासे खाण्यास चालू केले. तेव्हा त्यांना मास्यांचा वास अत्यंत उग्र येत होता. तर मासे सडल्यासारखे दिसत होते. मास्याच्य्या आतमध्ये काळसर-निळसर रंग स्पष्टपणे दिसत होता. त्या खराब मास्यांमुळे ग्राहकाला उलटी आल्यासारखे झाले.
मासे खराब असल्याचे लक्षात येताच, ग्राहकाने याबाबत वेटरला सांगितले, परंतु, वेटरने उलट ‘मासे चांगले आहेत, बिंदास खा’ असे सांगितले. त्यानंतर संबंधित युवकाने हॉटेल मालकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळून ग्राहकांची समजूत काढण्याची आवश्यकता होती. मात्र त्यांनी अत्यंत उद्धट व अपमानास्पद वर्तन केले व या प्रकरणाकडे कानाडोळा केला.
हॉटेल मालक कसलीही दखल घेत नसल्याने संबंधित तरुणाने प्रसंगावधान राखत संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले आहे. यामध्ये त्याने काही ग्राहकांच्या या पदार्थाबाबत प्रतिक्रिया घेतल्या. इतर ग्राहकांनीही त्या मास्याचा वास घेऊन ते खराब असल्याची पुष्टी दिली आहे. हे खराब मासे खाल्ले असते तर लहान मुलीच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असता. सडलेले मासे देणे म्हणजे ग्राहकांच्या जीवाशी खेळ आहे. असा आरोप करून संबंधित युवकाने व्हिडीओ बनवून हॉटेल प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, अनेकदा तुम्ही हॉटेलमध्ये जाता मात्र, तेथे भरभक्कम पैसे देऊनही चांगलं जेवण मिळत नाही. त्यामुळे पैसे तर जातातच पण जेवणही खराब दिलं जातं. त्यामुळे आता तुम्ही जेवणाच्या गुणवत्तेबाबत फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडे हॉटेलविरोधात ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात.
याबाबत बोलताना तिरंगा हॉटेलचे मालक अनिल रासकर म्हणाले की, अनेक वर्षापासून आम्ही ग्राहकांना अल्पदरात आणि दर्जेदार सेवा देत आहोत. आम्ही ग्राहकांच्या विश्वासामुळेच इथपर्यंत पोहोचलो आहोत. संबंधित ग्राहकाने मास्यांच्या संदर्भात केलेले आरोप खोटे आहेत. त्यावेळी हॉटेलमध्ये 100 हून अधिक ग्राहक उपस्थित होते. त्यामधील कोणत्याही ग्राहकाने तक्रार केलेली नाही. उलट संबंधित ग्राहकाला दुसरे मासे देण्याची सुद्धा तयारी दर्शवली होती. त्यामुळे हे सर्व आरोप बिनबुडाचे असून यामध्ये काहीही तथ्य नाही. आमच्या हॉटेलची बदनामी करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
अन्न व औषध प्रशासनाची डोळेझाक
पुणे जिल्ह्यातील अनेक हॉटेलचा दर्जा खालावला असल्याचे एकंदरीत ग्राहकांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारीवरून समोर येत आहे. बहुतांश हॉटेलमध्ये परप्रांतीय कामगारांचा भरणा असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. हॉटेलमध्ये अनेक पदार्थ खूप दिवसांपर्यंत डीप फ्रीझर मध्ये ठेवले जातात. तसेच ते पदार्थ गरम करून ग्राहकांना दिले जातात. बऱ्याचवेळा या पदार्थांची मुदत संपलेली असते. त्यामुळे सरळ सरळ हा ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. अन्न व औषध प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्यामुळे हॉटेल चालकांचे चांगलेच फावले आहे.






